मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

भाग -2 इदी अमीन -सत्तेची भूक आणि सत्तापालट

इदी अमीन

भाग -2

इदी अमीन -सत्तेची भूक आणि सत्तापालट

१९५९ मध्ये त्याला सेकंड क्लास वॉरंट ऑफिसर बनवण्यात आले, जे त्या काळात एका कृष्णवर्णीय आफ्रिकन व्यक्तीसाठी जवळपास अशक्य मानले जायचे. याच काळात तो युगांडाला परतला आणि इथूनच ती कहाणी सुरू झाली, ज्याने युगांडाला मृत्यूच्या छायेखाली ढकलले. १९६१ मध्ये त्याला कमिशन ऑफिसर बनवण्यात आले आणि ही पदवी मिळवणारा तो आफ्रिकेतील फक्त दुसरा व्यक्ती होता. याच वेळी मिल्टन ओबोटे नावाचा दुसरा नेता उदयास येत होता. दोघेही ब्रिटिश सैन्यात एकाच रँकवर होते आणि दोघांनीही आपल्या देशवासियांविरुद्ध काम करून आपली निष्ठा सिद्ध केली होती.

पण याच काळात इदी आणि ओबोटे यांनी सोने आणि हस्तिदंताच्या तस्करीचा खेळ सुरू केला. युगांडा तस्करीचे केंद्र बनले आणि पैसा ओसंडून वाहू लागला. “जर सत्ता आपल्या हातात आहे, तर कायदा देखील आपलाच आहे,” असे अमीनचे म्हणणे होते. १९६० च्या शेवटच्या वर्षांत ब्रिटिशांना संशय येऊ लागला, पण यापूर्वीच युगांडात स्वातंत्र्याची लाट उसळली. या वातावरणाचा फायदा घेत मिल्टन ओबोटेने स्वतःला कार्यकारी राष्ट्राध्यक्ष घोषित केले, तर इदी अमीनने संयम राखत पडद्याआडून आपली खेळी खेळली.

१९६२ मध्ये युगांडाला स्वातंत्र्य मिळाले. ओबोटे पंतप्रधान बनला आणि इदीला लष्कराचा डेप्युटी कमांडर बनवण्यात आले. १९६४ मध्ये त्याला लष्कराचा कमांडर बनवण्यात आले आणि इथूनच त्याच्या मनात सत्तेची भूक जागी झाली. १९७० मध्ये त्याला संरक्षण दलाचा कमांडर बनवण्यात आले. आता त्याच्याकडे सत्ता होती, सैन्य होते आणि एक असा उद्देश होता जो इतिहासात विनाश लिहिणारा ठरला.

१९७१ मध्ये, जेव्हा ओबोटे सिंगापूरला कॉमनवेल्थ शिखर परिषदेसाठी गेले, तेव्हा अमीनने आपली चाल खेळली. त्याने आपल्या निष्ठावान सैनिकांना विमानतळ आणि रस्ते बंद करण्याचे आदेश दिले. काही तासांतच, एकही गोळी न चालवता, सत्तेची चावी अमीनच्या हातात आली.  लोकांनी ना नारे दिले, ना विरोध केला, कारण ओबोटेवरचा विश्वास तुटला होता आणि अमीनमध्ये त्यांना आशेचा किरण दिसत होता. “मी तुमचा नेता आहे आणि तुमचा रक्षकही,” असे म्हणत अमीनने स्वतःला युगांडाचा राष्ट्राध्यक्ष आणि कमांडर-इन-चीफ घोषित केले.

पण ज्या दिवशी तो सत्तेत आला, त्या दिवशी युगांडाची दिशा बदलली आणि भयाचे नवे युग सुरू झाले. त्याने ओबोटेला देशद्रोही ठरवले आणि त्याच्या समर्थकांना मृत्यूची धमकी दिली. त्याने गव्हर्नमेंट हाऊसचे नाव बदलून डेथ कमांड पोस्ट ठेवले आणि जनरल सर्व्हिस युनिटचे नाव बदलून स्टेट रिसर्च ब्युरो केले, जिथे हजारो लोकांना यातना देण्यात आल्या. त्याने एक खास सैन्य तयार केले, ज्यांचे काम फक्त शत्रूंना नष्ट करणे होते.

१९७२ मध्ये, जेव्हा ओबोटेच्या समर्थकांनी सत्तापालटाचा प्रयत्न केला, तेव्हा अमीनने त्यांना चिरडले आणि यानंतर त्याचा वेडेपणा वाढतच गेला. त्याने अचोली समुदायाला लक्ष्य केले, ज्यांना तो ओबोटेचे समर्थक मानायचा. सुमारे ५,००० सैनिक आणि १०,००० नागरिकांचा नरसंहार झाला. युगांडात फक्त इस्लामचाच बोलबाला होता; इतर धर्म, जाती किंवा समुदायांचे लोक एकतर गायब होत होते किंवा तुरुंगात सडत होते.

अमीनने शिक्षित वर्गाला—विद्यार्थी, वकील, डॉक्टर, शिक्षक, धार्मिक नेते—लक्ष्य केले. जो कोणी प्रश्न विचारायचा, तो गायब होत असे. नाईल नदीत मृतदेह तरंगताना दिसायचे आणि व्हिक्टोरिया तलाव मृतदेहांनी भरून गेले होते. त्याने यातनागृहे बांधली, जिथे लोकांना विजेचे झटके, गॅस चेंबर आणि क्रूर यातना दिल्या जायच्या. त्याच्या यातनांचे स्वरूप नाझी जर्मनीसारखे होते. त्याने गर्वाने सांगितले, “मी हिटलरच्या विचारांपासून प्रेरित आहे.”

१९७२ मध्ये, अमीनने एक स्वप्न पाहिल्याचा दावा करत सर्व गैर-युगांडाचे नागरिक आणि ब्रिटिश पासपोर्टधारकांना ९० दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला. यामुळे हजारो भारतीय आणि इतर समुदायांना आपली संपत्ती, व्यवसाय आणि घरे सोडून पळावे लागले. युगांडा एक उघडा तुरुंग बनला. त्याने व्यापाऱ्यांची मालमत्ता आपल्या अशिक्षित सैनिकांना दिली, ज्यांना व्यवसाय चालवण्याची काहीच कल्पना नव्हती. यामुळे युगांडाची अर्थव्यवस्था कोलमडली.

१९७५ मध्ये, युगांडाचे अर्थमंत्री इमॅन्युएल ब्लायवाका आणि आरोग्य मंत्री हेन्री कायंबा यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आणि “ए स्टेट ऑफ ब्लड” नावाचे पुस्तक लिहिले, ज्याने अमीनच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला. १९७६ मध्ये, त्याने स्वतःला “प्रेसिडेंट फॉर लाइफ” घोषित केले. त्याला सुरुवातीला इझ्राएल, ब्रिटन आणि जर्मनीकडून मदत मिळत होती, पण जेव्हा त्याने ८० ब्रिटिश कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले, तेव्हा हे देश त्याच्यावर नाराज झाले. त्याने इझ्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आणि हिटलरचे समर्थन करणारी विधाने केली.

१९७७ पर्यंत, अमीनच्या क्रूरतेमुळे त्याच्या सैन्यातही फूट पडली. युगांडा लिबरेशन मूव्हमेंटने त्याला सत्तेतून हटवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. १९७८ मध्ये, त्याने टांझानियावर हल्ला केला, पण टांझानिया सैन्याने त्याला पराभूत केले आणि कंपालावर कब्जा केला. अमीन लिबियाला आणि नंतर सौदी अरेबियाला पळाला. तिथे त्याला राजकीय निष्क्रियतेच्या अटीवर आश्रय मिळाला.

१९८९ मध्ये, त्याने पुन्हा बंडखोर सैन्य उभारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. सौदी अरेबियाने त्याला परत स्वीकारले, पण त्याला पूर्णपणे शांत राहण्याची अट घातली. २००३ मध्ये, मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

इदी अमीन हा एक असा हुकूमशहा होता, ज्याने रक्ताला पाणी मानले, माणुसकीला मातीमोल ठरवले आणि स्वतःला देव मानले. त्याच्या कारनाम्यांनी युगांडाला मृतदेहांनी भरले आणि माणुसकीच्या नावाने एक काळा अध्याय लिहिला. ही कहाणी तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर इतिहासाच्या या काळ्या पानांना कधीही विसरू नका.


टिप्पण्या